पाटणा l नितीश कुमार यांनी आज सोमावार 16 नोव्हेंबर रोजी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मात्र या शपथविधीला भाजपाचे नेते माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी दांडी मारली. सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे ते पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत.
सु्शील मोदी यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी माझा कार्यकर्तापद कुणीही काढून घेऊ शकत नाही असं ट्विट केलं होतं. सुशील मोदी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक होते. आज या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. परंतु सुशील मोदी यांनी अनुपस्थित राहून पुन्हा एक ट्विट केले.
नितीशकुमार यांच्यासोबत ताराकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजकारणात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी ताराकिशोर प्रसाद, रेणू देवी यांची नावं चर्चेत आहेत. शपथविधीपूर्वी काल नितीश कुमार यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असं विधान केल्याने ते चर्चेत आले होते.