मुंबई: महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजाबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते,’ अशा आशयाचं विधान अजित पवारांनी केलं. या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. तसेच अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणीही भाजपाकडून करण्यात आली आहे. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का? असा खोचक सवाल मिटकरींनी विचारला आहे.
तसेच देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी औरंगजेबाचे वारसदार बसले आहेत, अशी टीकाही मिटकरींनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. अजित पवारांचं संभाजी महाराजांबद्दलचं विधान आणि भाजपाचं आंदोलन यावर भाष्य करता अमोल मिटकरी म्हणाले, “देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी औरंगजेबाचे वारसदार बसले आहेत. कारण जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यावेळी भाजपाचा एकही व्यक्ती रस्त्यावर आंदोलन करताना दिसला नाही.”
“आज छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते… असं जेव्हा अजित पवार बोलले, तेव्हा एका सुरात भारतीय जनता पार्टीची लोक पेटायला लागली. अरे इतकं पेटायचं काय कारण आहे? तो भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का?” असा सवाल मिटकरींनी विचारला.
“जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांनी महापुरुषांचा अवमान केला, त्याविरोधात एकही ‘माई का लाल’ पुढे आला नाही. आता सगळेजण एका माणसाविरुद्ध आंदोलन करत आहेत,” अशी टीका मिटकरींनी केली.