मुंबई: केंद्र सरकारने (Central Goverrnment) अचानक लागू केलेल्या टाळेबंदीमुळे(Lockdown)लाखो मजूर व गोरगरिबांचे हाल झाले. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था काँग्रेस पक्ष(Congress)व महाविकास आघाडी सरकारने (Maha vikas aghadi)केली होती. अडकून पडलेल्या ५० हजार मजुरांना काँग्रेस पक्षाने स्वखर्चाने आपापल्या गावी परत पाठविले होते. केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यानेच आम्ही मदत केली व त्याचा आम्हाला अभिमान, असे प्रत्युत्तर महसूलमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वक्तव्यावर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. करोनाकाळात उत्तर भारतीय मजूर बांधवांना राज्य सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, केंद्र सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, असे थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने कोणतीही तयारी न करता देशभर टाळेबंदीची घोषणा केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारी बांधवांची स्थिती बिकट झाली, हातावर पोट असलेल्या सदर मजुरांना उपाशी मरण्याची वेळ आली.
अशा वेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या सूचनेवरून आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीमार्फत सदर मजुरांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. अनेक मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. जेव्हा हे मजूर बांधव घराच्या ओढीने आपल्या राज्यात परत जाऊ इच्छित होते, तेव्हा देशभर रेल्वे बंद होत्या.
मजूर पायपीट करत उत्तर प्रदेश आणि बिहारकडे निघाले होते. त्यात अनेकांचा मृत्यू झाला हे देशाने पाहिले. ही व्यथा बघून सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आम्हाला आवश्यक त्या सूचना केल्या आणि सदर मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
आम्ही उत्तर भारतीय बांधवाच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुमारे ५० हजार मजुरांना स्वखर्चाने सुखरूप आपापल्या गावी पोहोचविले. महाविकास आघाडी सरकारनेदेखील दोनशे कोटी रुपयांची तरतूद करत सदर मजुरांची स्वत:च्या राज्यात जाण्याची सन्मानजनक व्यवस्था केली.