Bharamanti live : ‘त्या’ पाटील देशमुखांच्या घरात

संदीप काळे, भ्रमंती लाईव्ह स्टोरी

आपल्या राज्यात पाटील, देशमुख यांच्या घरात अजून अशा अनेक रूढी प्रथा आहेत. ज्या रूढी प्रथामुळे अनेकांचे आयुष्य काळवंडले आहे. ह्या जुन्या परंपरा जपतांना कुणाला आनंद नक्कीच होणार नाही, पण अनेक महिलांचे आयुष्य मात्र तसेच संपून जाते, कुणाची तरी वाट पाहून. ही सत्य घटना त्याचेच एक उदाहरण आहे.

यवतमाळपासून अगदी जवळ असलेल्या देशमुखवाडी गावात माझा मित्र विजयकुमार देशमुख यांच्या घरी गेलो. पाच काका एकत्रित. घरी जमीन, वाडा, पाच काकांची नऊ मुले, पाच मुली. मुलांच्या बायका, त्यांची मुले बापरे खूप मोठा परिवार होता. सर्वांची ओळख करून देण्यात खूप वेळ गेला. त्या ओळखीमध्ये विजयची एक सख्खी बहीण सुजया आणि एक चुलत बहीण कावेरी दोघीही त्याच घरात राहतात. त्यांचीही विजयने ओळख करून दिली. विजयची बहीण सुजयाचा विवाह वाडीजवळ असलेल्या एका गावात श्रीमंत घरी झाला होता. लग्नाच्या एका वर्षानंतर सुजयाच्या नवऱ्याने ट्रॅक्टरसाठी माहेरहून पैसे आण म्हणून वाद घालायला सुरुवात केली. हा वाद दोन वर्षे चालला. यावरून दोघा नवराबायकोची फारकत झाली. या फारकतीला आता आठ वर्षे पूर्ण झाली.

लग्नाच्या दोन वर्षांनंतर कावेरीच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला. कावेरीचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. त्या अपघाताला १४ वर्षे झाली. कावेरी आणि सुजया या दोघींचा काहीही दोष नसताना त्या दोघींना घरामध्ये आपलं उभं आयुष्य काढावं लागत होतं. मी जेव्हा विजयला या दोघींच्या आयुष्याचा, लग्नाचा विषय काढला तेव्हा विजय म्हणाला, ‘‘हा माझ्या बाबांचा विषय आहे,’’. सगळ्यांचे जेवण झाल्यावर विजयचे वडील शिवाजीराव देशमुख म्हणाले, ‘‘ताईला जेवणाचे ताट गेलं का?’’ मी विजयला विचारलं, ‘‘अजून कोणी पाहुणे घरात आलेत का? त्यांना जेवणाचे ताट जातंय.’’

विजय म्हणाला, ‘‘माझी आत्या मागच्या घरामध्ये झोपलेली आहे. तिला चालता येत नाही. तिचं सारंकाही बेडवरच करावं लागतं.’’ मी विजयला म्हणालो, ‘‘तिला कोणी मूलबाळ नव्हतं का?’’ विजय थोडासा शांत बसून म्हणाला, ‘‘आत्याचं लग्न झाल्यावर दोन महिन्यांमध्येच आत्याला लग्न करून दिलेला नवरा मुलगा, त्याला खूप मोठे आजार असल्याचं पुढे आलं. त्या आजारातून तू कधीही मरू शकतो, हे डॉक्टरांनी काढलेलं अनुमानही पुढे आलं. आम्हाला आजाराबद्दल सांगितले नाही, आम्हाला धोका दिला, असा राग मनामध्ये धरून आमच्या आजोबांनी आत्याला घरी आणलं. तेव्हापासून ८४ वर्षे वय असलेली आत्या आमच्याच घरी आहे.’’ मी म्हणालो, ‘‘आत्यानं पुन्हा लग्न केलं नाही का?’’ आमचं बोलणं दबक्या आवाजामध्ये सुरू होतं, ते विजयच्या वडिलांनी ऐकलं. ते म्हणाले, ‘‘आमच्या वाडवडलांपासून मुलीचं दुसरं लग्न करायचं नाही, अशी पद्धत आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्यापासून ज्या मुली काही कारणास्तव माहेरी परत येतात, त्या कायमस्वरूपी माहेरीच राहतात. जवळजवळ त्यांच्या लग्नाचा विचार केला जात नाही. काही गावात आणि शहरात अलीकडच्या काळात कुठे कुठे अशी लग्न आता जमत आहेत; पण प्रमाण फारच कमी आहे.’’ आमच्या बाजूला बसलेल्या विजया आणि कावेरी या दोघी जणी हे ऐकत होत्या. मलाही काय बोलावं हे कळेना.

शेवटी बोलण्यामधून कोंडी फुटावी, यासाठी मी शेतीचा विषय काढला. लग्नाचा विषय तसाच तिथे थांबला. अंथरुणावर झोपून असलेली आत्या. आत्यासाठी ताट वाढणारी कावेरी. सगळ्यांचं जेवण झाल्यावर भांडी घासणारी सुजया. या तिघींची मी ऐकलेली कहाणी. त्यांनी आयुष्यभर काहीतरी चांगलं होईल, या आशेने ढकललेले दिवस, माझ्या नजरेसमोर येत होते. मला कावेरी, आत्या आणि सुजयासोबत बोलायचं होतं. मी विजयला घेऊन, आत्याच्या मागच्या रूममध्ये गेलो. आमच्या पायाचा आवाज ऐकून आत्या म्हणाली, ‘‘एवढ्या रात्रीला कोण आलं.’’ विजय म्हणाला, ‘‘आत्या मी आहे विजय.’’ आत्या म्हणाली, ‘‘आज आत्याची कशीकाय आठवण झाली.’’ विजय म्हणाला, ‘‘मुंबईहून माझा मित्र संदीप आलाय. बाबांनी तुझ्याविषयी संदीपला सांगितलं. तो म्हणाला आपण आत्याला भेटूच.’’ आत्याने माझी विचारपूस केली. मी आत्याला म्हणालो, ‘‘तुमचं लग्न जेव्हा तुटलं तेव्हा तुम्ही किती वर्षांची होता?’’ आत्या म्हणाल्या, ‘‘असेल बारा-तेरा वर्षांची. जेव्हा तुम्ही घरी परत आलात, तेव्हा तुमच्या घरच्यांना तुमच्या आई-वडिलांना असे वाटले नाही का की, तुमचं दुसरं लग्न करून द्यावं.’’ आत्या हळू आवाजात म्हणाल्या, ‘‘तशी रीतभात नाही आमच्याकडे. लग्न झालेली मुलगी घरात आली म्हणजे ती परत दुसरे कोणाला द्यायचे नाही, अशी जणू प्रथाच आमच्याकडे आहे.’’

‘‘आमच्याच घरात नाही, तर आमच्या पाव्हण्या-रावण्यांमध्ये सगळीकडे कित्येक प्रकरणे तुम्हाला अशी दिसतील. काही ठिकाणी असे लग्न झाले असतील तर त्या घरामध्ये कधी यश आलं नाही. माझ्या आजोबांनी अशी कितीतरी उदाहरणे मला सांगितली. जिथल्या पिढ्यानपिढ्या अशा दुसऱ्यांदा लग्न केल्यामुळे बरबाद झाल्या.’’ आमचे बोलणे सुरू असतानाच विजय आतमध्ये गेला. त्याने कावेरी आणि सुजयाला बोलवून आणलं. एवढ्या रात्री ‘त्या’ दोघीही आत्याच्या जवळ आल्यामुळे आत्यालाही आश्चर्य वाटलं.

आत्या म्हणाल्या, ‘‘आमच्याच घरात आम्ही तिघीजणी आहोत. आमच्या गावात तुम्हाला दर वीस घरामागे एक मुलगी दिसेल. तशीच परिस्थिती पंचक्रोशीत, जिल्ह्यात आहे. राज्यात अनेक ठिकाणी आमचे पाव्हणे आहेत, तिथे अनेक ठिकाणी ही प्रथा आहेच. पाटील आणि देशमुखांच्या घरी जन्म घेताना बाईने नशीब घेऊनच जन्म घ्यावा लागतो. नाहीतर खूप त्रास होतो.’’ कावेरी आणि सुजया यांच्याकडे तर याबाबत मोठी लिस्ट होती. आता त्या तिघीजणीही चांगल्या खुलल्या होत्या. त्यांच्या भावना, त्यांच्या अडीअडचणी, त्यांचं तारुण्य, लोकांच्या असलेल्या वाकड्या नजरा, घरात सातत्याने कोपऱ्यात बसणे, कुठल्याच उत्सवात सहभागी न होणे, या सगळ्यांतून या तिघींचे आयुष्य किती काळवंडलेले आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.

कावेरी म्हणाली, ‘‘जेव्हा आमच्या घरात आमच्या लग्नाचे विषय चालायचे, तेव्हा आमच्या भावांच्या बायका आम्हाला पूर्ण सोडून द्यायच्या. तोंड वाकडे करून चार-चार दिवस बोलायच्या नाहीत. आईला खूप वाटायचं, आमचे लग्न झाले पाहिजे; पण बाबांना ते मान्य नव्हते. घरातली सगळी माणसं आमच्या लग्नाला विरोध करायची. काही स्थळं चालून आली होती; पण कोणाला दोन-दोन मुलं होती. कोणी दारू पिणारे होतं. कुणाचं वय पन्नासच्या वर झालेलं होतं. अशा स्थळांसोबत लग्न करण्यापेक्षा मुली आयुष्यभर घरात बसलेल्या बऱ्या, असं घरातली वडीलधारी माणसं म्हणायची.’’ मी, विजय, आत्या, कावेरी, सुजया खूप वेळ बोलण्यात दंग झालो. आत्या खूप जुने विषय आम्हाला सांगत होत्या. आमचे बोलणे एकदम रंगात आले होते, तेव्हा आत्या म्हणाली, ‘‘बिनालग्नाचे आयुष्य काढणे सोपे नसते बाबा. मी जेव्हा जेव्हा या दोन्ही मुलींच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलते तेव्हा तो मला विजयचा बाप नेहमी म्हणतो, लग्न करणे काय तोंडाचा खेळ असतो काय? त्याला खूप पैसे लागतात. माणसांच्या भावना आणि आयुष्य यांच्यापेक्षा यांना पैसा फार महत्त्वाचा असतो. सगळेजण बेगडी प्रथेला चिकटून बसले आहेत.’’ आत्याच्या बोलण्यानंतर आम्ही सारे एकदम शांत बसलो.

आत्या खाटेवरून उठल्या. त्यांनी कमरेला असलेली पिशवी काढली. त्यात एक चावी होती, ती विजयच्या हाती दिली. विजयला म्हणाल्या, ‘‘तो सन्दुक काढ.’’ विजयने सन्दुक काढला. आत्याने सांगितल्याप्रमाणे सन्दुकमधून जर्मनचे दोन मोठे जुने डबे काढले. एका डब्यात चिल्लर पैसे होते, एका डब्यात जुन्या नोटा होत्या. आत्या म्हणाल्या, ‘‘बाबा घरातला सर्वात शिकलेला तूच मुलगा आहेस. हे पैसे माझ्याकडे आतापर्यंत साठवून ठेवलेले पैसे आहेत. हे घे आणि या दोन्ही मुलींच्या लग्नाचे पाहा. तुझ्या बाबांनाही सांग.’’ आत्याचे बोलणे ऐकून आमची अस्वस्था अजून एकदम वाढली.
आत्याचे बोलणे ऐकून कावेरी आणि सुजया रडायला लागल्या. आम्ही बोलण्यात एकदम दंग होतो. मागे विजयचे बाबा कधी येऊन थांबले ते आम्ही कुणी पाहिलेच नाही.

बाबा शांतपणे आत्याच्या जवळ येऊन बसले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही समजता तेव्हढा राक्षसी माणूस नाही मी. फक्त सामाजिक परंपरेने माझे हात बांधले आहेत. मला काय वाटत नाही का माझी मुलगी कुठेतरी सुखाने नांदावी म्हणून.’’या विषयावर आमची अजून खूप चर्चा झाली. सकाळी चहा घेताना बाबांनी कोणत्या गावात कोणत्या पाटील आणि देशमुखांच्या घरी किती मुली लग्नाच्या आहेत, हे सांगितले. विजयचे मोठे काका तर राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यात असलेली ही प्रथा या काळातही किती घातक आहे, हे सांगत होते.

मी विजयच्या घरून मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो. मी जेव्हा हे मुलींचे लग्न होत नाही या विषयाच्या खोलात गेलो, तेव्हा मला अजून खूप माहिती मिळाली. गावकीला चिकटून असणाऱ्या देशमुख आणि पाटील यांच्या घरात अजूनही मुलींचे दुसरे लग्न करताना ‘नाहीचा पाढा’ वाचला जातो. त्या मुलींचे उभे आयुष्य रोज जळते, हे ते डोळ्यांनी पाहतात. व्यक्तिस्वातंत्र्य, माणुसकी याचे काही देशमुख आणि पाटील या बेगडी चेहरा लावणाऱ्यांना देणे-घेणे नाही. असेच हे आहे, बरोबर ना..?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here