औरंगाबाद : पोलीस भरतीत डॉक्टर, इंजीनअर, वकील, उच्चशिक्षीत तरुणांनी अर्ज केले. नोकरभरती रखडली, बेरोजगारी, महागाई वाढली. या मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपाकडून लव्ह जिहाद, ईडीचा वापर, शिवाजी महाराजांचा अवमान हे मुद्दे उकरले जातात. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तुमच्या प्रश्नाशी मी शंभर टक्के सहमत आहे. भाजप महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी जातीय तेढ निर्माण होईल असे मुद्दे उकरण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप अजित पवारांनी केला.
पत्रकार परिषदेला आ. सतीष चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आ. संजय वाघचौरे, आ.संजय बनसोडे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल यांची उपस्थिती होती. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर राष्ट्रवादी भवनात अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, सध्याच्या सरकारचं आकाशाला भिडणारी महागाई आणि बेरोजगारीकडे लक्ष नसून, सध्याचं सरकार केवळ वेगवेगळ्या व्यक्तींना राजकीय हेतुने त्रास देण्याचं काम करण्याचे काम करतय. पाकिस्तानची परिस्थीती आपण बघतोय. महागाईने उच्चांक गाठलाय. तीच परिस्थिती आपल्या देशात झाली आहे. दिवसेंदिवस वाईट परिस्थिती होत चालली आहे. जर देशात अशीच परिस्थिती राहीली तर देशाचे तुकडे होतील अशीही भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.
या राजकीय हेतुने होणाऱ्या कारवाया थांबवायच्या असतील आणि तुमचा माझा महाराष्ट्र सावरायचा असेल तर, यासाठी शाहु, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्यचं काम राज्यसह भारतालाही परवडणारं नसल्याचे पवार म्हणाले.
मुश्रीफांवरवरील कारवाईवरुन अजित पवार म्हणाले की, मुश्रीफांशी माझं बोलणं झालं नाही. यापूर्वीही त्यांच्या घरावर धाडी पडल्या होत्या. सीबीआय, इनकटॅक्स, एंन्टीकरप्शन, सीआयडी यांना चौकशीचा पूर्ण अधिकार आहे. परंतु मुश्रीफांच्या कुटुंबियांना त्यांच्या मुलांना त्रास देने योग्य नाही. जे शिंदेगटात गेले नाही त्या राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांना नोटीसा देण्यात आल्या.
संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यां नेत्यांवर अशाप्रकारे सुडबुद्धीने कारवाई करणे चुकीचे आहे. छगन भुजबळ यांनाही का अटक करण्यात आली होती. भाजप मध्ये आल्याबरोबर शांत झोप लागते,अशी वक्तव्ये आली. हर्षवर्धन जाधव आणि आणखी काही जणांनी अशी वक्तव्ये केलेली आहे. यामुळे संभ्रम निर्माण होतो. आता जनतेलाही हे कळायला लागलं आहे.