
पैठण (औरंगाबाद): राज्यात महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू आहे. आता भाजप नेते (BJP) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी महापुरुषांवरील केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘कर्मवीर भाऊराव पाटील (karmaveer bhaurao patil), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb ambedkar) आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेतील पैठण येथील संतपिठाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
‘कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील या कार्यक्रमात पुढे म्हणाले, ‘अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशामध्ये शाळा कुणी सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली’.
‘शाळा सुरु करायच्या आहेत आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा-दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेऊन ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढं गेलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.
काय म्हणाले होते राज्यपाल?
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यपाल म्हणाले होते, ‘तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील’
‘शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.