
मुंबई: शिवसेना (ShivSena) पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा न दिल्यामुळे छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosle) यांनी माघार घेत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केली होती. संघटनेच्या घोषणेपासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भूमिका काय असणार याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. दरम्यान, छत्रपतींनी आज (३ ऑगस्ट) एक सूचक ट्वीट करत समर्थकांना येत्या ९ ऑगस्ट रोजी तुळजापुरात जमा होण्याचे आवाहन केले आहे. तसेच क्रांतीदिनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार आहे, असे सूचक विधान छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या ९ ऑगस्ट रोजी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. ही घोषणा नेमकी काय असेल? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्यांनी आपल्या ट्वीटममध्ये क्रांतीदिनी राज्याच्या परिवर्तनाची क्रांती होईल, असे सूचक विधान केले आहे. तसेच त्यांनी या दिवशी सर्व समर्थकांना तुळजापूर येथे येण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे भोसले या दिवशी नेमकी काय घोषणा करणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात…
भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला…#स्वराज्य
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 3, 2022
१२ मे रोजी स्वराज्य संघटनेची घोषणा
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर १२ मे रोजी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. याच संघटनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी महाराष्ट्र दौरा केला होता.