औरंगाबाद l व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आजच्या भाषणात केला. कथितपणे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना उल्लेखून केलेल्या या वक्तव्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष (Maharashtra Congress president) नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षांचे नेते देत आहेत. मुख्यमंत्र्यांना गंमत करायची सवय आहे. त्यानुसारच ते बोलले, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत लोकांमध्ये ताणतणाव आहे. मुख्यमंत्र्यांची आधीपासूनच थट्टामस्करी करण्याची सवय आहे. आजही त्यापद्धतीने त्यांनी जोक केला, गंमत केली.
शेवटी ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा ते त्यांच्या हातात आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे चालणार असा विश्वास आहे. त्यांनीही तो बऱ्याचदा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की हे विधान फारसं गांभीर्याने घ्यावं.
सध्या भाजपा खूप तणावग्रस्त आहेत. त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असेल, असंही ते म्हणाले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
हेही वाचा
मोदी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील;संजय राऊतांचा टोला