औरंगाबाद : आई वडिलांना शिव्या द्या चालेल, आमची कोल्हापूरची पध्दत आहे. परंतु नरेंद्र मोदी, अमित शाहांना शिव्या दिल्या तर सहन केले जाणार नाही. असे वक्तव्य भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केले. त्यावर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी औरंगाबादेत संताप व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आश्चर्यकारक वाटते. आपल्या हिंदुत्वमध्ये आई-वडील सर्वोच्च स्थानी आहेत, असा टोला ही पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खासगी बसला आग लागल्यामुळे ज्या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला हे भाजप सरकारचे पाप आहे. कारण राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक आपले जीव गमावत आहे, अशी टीका पटोले यांनी केली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, महाविकास आघाडीला सेक्युलर विचाराचे आहे, जो कुणी पाठिंबा देईल तो आम्ही घेऊ. मात्र हा निर्णय घेण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक नेत्यांशी बोलावे. त्यामुळे निर्णय चांगला घेतला जाईल. आंबेडकर यांना दिल्लीशी बोलायचे असेल तर त्यांनी तेही करावे मात्र निर्णय स्थानिक नेत्यांशी बोलल्यावरच होईल, असंही नाना पटोले म्हणाले.
नाना पटोलेंच्या स्वागतासाठी प्रदेश उपाध्यक्ष एम.एम.शेख, निरीक्षक मुजाहेद खान, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ लिडर, प्रदेश प्रवक्ते डॉ. पवन डोंगरे, प्रदेश सरचीटणीस डॉ.जफर खान, डॉ.अरुण शिरसाठ दीपाली मिसाळ, मंजु लोखंडे, प्रकाश वाघमारे, अनिस पटेल, कैसर बाबा, शेख अथहर यांच्यासह इतर पदाधिकारी होते.