नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा थैमान सुरुच आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. मात्र, रुग्णांच्या संख्येमध्ये भर पडत आहे. भारतातील कोरोना कधी नियंत्रणात येणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दिवाळीपर्यंत कोरोना प्रसार नियंत्रणात येईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे.
अनंतकुमार फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नेशन फर्स्ट वेबीनार सीरिजचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उद्घाटन केलं. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी भारताची कामगिरी चांगली आहे, असं त्यांनी सांगितलं.
नेत्यांसह सर्वसामान्य माणसांनी कोरोनाच्या साथीविरूद्ध एकजुटीनं व प्रभावीपणे लढा दिला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्याच्या आधीच आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या आजपर्यंत २२ बैठका झाल्या आहेत,” असं डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.
दिवसाला १० लाख चाचण्या
देशभरात १ हजार ५८३ प्रयोगशाळा आहेत. यापैकी एक हजाराहून अधिक सरकारी प्रयोगशाळा आहेत. देशात सुमारे दिवसाला १० लाख चाचण्या घेतल्या जात असून, याची संख्या ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा खूप जास्त आहे,” असंही हर्ष वर्धन म्हणाले.
१० उत्पादक एन ९५ मास्कचं उत्पादन
“पीपीई किट्स, व्हेटिंलेटर आणि एन ९५ मास्क यांची टंचाई आता राहिलेली नाही. देशात दररोज पाच लाख पीपीई किट तयार केल्या जात आहेत. १० उत्पादक एन ९५ मास्कचं उत्पादन करत आहेत. २५ उत्पादक व्हेटिंलटर तयार करत आहेत. असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन सांगितलं.