मुंबई: महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना केवळ ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आजच्या विधानावरून केंद्र सरकार महाराष्ट्राला जाणूनबुजून सावत्र वागणूक देत असल्याचे सिद्ध होत आहे. पण सम्पूर्ण लसीकरण हा विषय, त्याबाबतचे धोरण, इ स्वतःच्या ताब्यात ठेवत केंद्राने लसीकरण मोहिमेचा जणू बट्याबोळ केला आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
महाराष्ट्राला अधिक लस पुरवून सर्वात बाधीत जिल्ह्यामध्ये सर्वाना लसीकरण करण्याची केंद्राने परवानगी देणे समयोचित ठरले असते. दुसरीकडे, भारत बायो व सिरम यांची दोन्ही मिळून वर्षाला केवळ २.५ कोटी लस निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे, या गतीने १२५ कोटी भारतीयांना लस मिळण्यास कित्येक वर्षे थांबावे लागेल. त्याउलट, परदेशात प्रभावी ठरलेल्या लस कंपन्याना भारतात परवानगी नाकारून नको तिथे आत्मनिर्भयपणा केंद्र सरकार दाखवत आहे.
महाराष्ट्रात, एकीकडे सकाळी टिव्ही वर राज्य सरकारला सहकार्य करायची विधान करायची आणि संध्याकाळी राज्य सरकारवर सडकून टीका करणाऱ्या प्रतिक्रिया टिव्ही वर द्यायच्या. यातून भाजपच्या नेत्यांचा दुतोंडीपणा स्पष्ट दिसून येतो.
आश्चर्याची बाब म्हणजे, महाराष्ट्रात कोरोनाच्या हाहाकाराच्या देशभर सर्वत्र बातम्या आणि निवडणूक होत असलेल्या राज्यातून कोरोनाचा नाव निशाणा नाही हे न पटणारे आहे. “ ऑन – लाईन “ चा आग्रह धरणाऱ्या मोदीजींनी मग जाहीर सभा ऐवजी “ ऑन – लाईन “ प्रचार का केला नाही ? मोदीजींनी व अमितभाई शाह यांनी सभांतून “ सोशल डिस्टनसिंग “ चे आवाहन का केले नाही असाही सवाल गाडगीळ यांनी केला आहे ?
[…] […]