मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी करत आहे. आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाबाधित वाढले आहेत. coronavirus-166-deaths-35-thousand-726-corona-patients-increased-in-a-day-in-the-Maharashtra-state-news-updates
सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज १४ हजार ५२३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.५८ टक्के एवढे झाले आहे.
हेही वाचा: Aurangabad Lockdown l औरंगाबादमध्ये 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.