ठाणे : सणांचे दिवस आहेत काळजी घ्या. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही. त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. आज सोमवारी उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकींसाठी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. (CM Uddhav Thackeray on Thane Corona)
कोरोना रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या चांगल्या आहेत. कोरोना रुग्णांची घटणारी संख्या. उपचार करुन घरी जाणा-यांची संख्या यावरून ठाण्याने कोरोनाचे संकट रोखण्यासाठी केलेले उपाय हे निश्चित कौतुकास्पद आहेत. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.
या बैठकीला नगरविकास मंत्री तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, सर्व मनपा आयुक्त, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक उपस्थित होते
“लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथीलता दिली आहे. तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करावे तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
“कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याच्या सूचना त्यांना प्रशासनाला केल्या.”
या आजारांकडे दुर्लक्ष करु नका…
तसेच पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करु नका. ठाणे मुंबईला लागून आहे. गेले काही महिने कोरोनावर लक्ष दिले गेले. पण आता आपल्याला इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. पावसाळी आजारांना दुर्लक्ष करु नका. मजुरांअभावी अनेक कामे बंद आहेत. नागरिकांतील भीती कमी होत आहे. हळूहळू सर्व मूळ पदावर आणायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.