नवी दिल्ली : आज काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांच्या पदाचा राजीमाना देणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. (CWC Meeting To Decide Who Is The New President Of INC).
काँग्रेस पक्षाची CWC ची बैठक आज अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीत नवीन अध्यक्ष नियुक्तीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.
काँग्रेसच्या 23 नेत्यांचा पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधींना पत्र…
काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध दर्शवला आहे. मात्र अध्यक्षपदाबाबत सोनिया गांधी, राहुल गांधी ह्यांच काय मतं आहे. ते आज च्या बैठकीमध्ये समजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सर्वांच्या नजरा काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडे येणार याचीच उत्सुकता लागलेली आहे.
दिल्ली काँग्रेसकडून प्रस्तावास मंजुरी
दिल्ली प्रदेश काँग्रेसने रविवारी एक आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये राहुल गांधी यांनी पक्षाचा अध्यक्ष बनवण्यासाठी एक प्रस्ताव मंजुर करण्यात आला. राहुल गांधींना कॉंग्रेसचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी डीपीसीसी अध्यक्ष अनिल कुमार यांनी केली (CWC Meeting To Decide Who Is The New President Of INC).
पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल : सुनिल केदार
“काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी तातडीने याबद्दल सोनिया गांधीची माफी मागितली पाहिजे,” असे ट्विट महाराष्ट्रातील दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केलं आहे.
त्यासोबतच “जर त्यांनी सोनिया गांधींची माफी मागितली नाही, तर त्यांना राज्यात काँग्रेस कार्यकर्ते कुठेही फिरकू देणार नाहीत,” अशा इशारा त्यांनी या नेत्यांना दिला आहे.
तसेच “जर पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे,” असेही सुनिल केदार म्हणाले. सुनील केदार यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले आहेत.
“कम बॅक राहुलजी”- बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील पत्राच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “राहुलजींनी आता कॉंग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे. त्यांच्या भावनांचा सन्मान करत, ‘कम बॅक राहुलजी’ असे आम्ही म्हणू इच्छितो. जोपर्यंत ते पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत नाहीत, तोपर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनियाजींनी कॉंग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे”, असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं.
“नेहरु-गांधी परिवाराशिवाय काँग्रेसची कल्पनाही करु शकत नाही”- दिग्विजय सिंह
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले, “ही वेळ काँग्रेसने एक मत मिळवण्याची आहे. मत भिन्नतेची नाही. ज्या कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यानंतर देशासाठी जे त्याग आणि बलिदान केले ते सर्वश्रुत आहे. प्रसारमाध्यमांवर जे काही येत आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. नेहरु गांधी परिवाराशिवाय मी काँग्रेसची कल्पनाही करु शकत नाही”.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लढण्यासाठी अध्यक्षपद राहुल गांधी यांना मिळावे”
आसामचे काँग्रेस अध्यक्ष रिपून बोरा यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राहुल गांधींना कॉंग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची विनंती केली. जेणेकरुन ते पक्षाचे नेतृत्व करु शकतील आणि भाजप आणि आरएसएसमोर लढा देऊ शकतील.
सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाला या नेत्यांचाही पाठिंबा
सचिन पायलट यांनी देखील याबाबत ट्विट करत त्यांचं मत व्यक्त केलं. “श्रीमती गांधी आणि राहुलजी यांनी दाखवून दिलं आहे की लोकांसाठी आणि पक्षासाठी बलिदान करण्याचा काय अर्थ असतो. आता एकमत करण्याची आणि एकत्र येण्याची वेळ आहे. जेव्हा आपण एकत्र येऊ, तेव्हा आपलं भविष्य अधिक मजबूत होईल. बहुतेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना राहुलजी पक्षाचे नेतृत्व करताना हवे आहेत”.
अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंह, संजय निरुपम आणि डीके शिवकुमार सारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाला योग्य म्हटलं आहे.
सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.