
मुंबई : गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, लहान भाऊच आहे. आपल्यात निकोप स्पर्धा असून महाराष्ट्र गुजरातलाच नव्हे, तर कर्नाटकलाही मागे टाकणार आहे. उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत गुजरातच्या पुढे जाऊन देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत केले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“काल उपमुख्यमंत्री म्हणाले गुजरातपेक्षा महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पुढे जाणार. २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्रामधील किती उद्योग आपण गुजरातला पाठवले, हे त्यांनी जाहीर करावं. फडवणीसांची आता पदावनती झालेली आहे. त्यामुळे आमच्या मित्राचा अपमान झालेलाच आहे.” असं पटोले यांनी म्हटलेलं आहे.
याचबरोबर, “आमदार प्रताप सरनाईक यांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावत भाजपाचे किरीट सोमय्या जी उठसूट त्यांच्या अटकेची मागणी करायचे. परंतू ते आता मूग गिळून गप्प का? सरनाईक भाजपा प्रणित ईडी सरकारमध्ये सामील झाल्यामुळे?, आधी भ्रष्ट वाटणारे सरनाईक सोमय्यांना एकाएकी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ वाटत आहेत. दुटप्पी राजकारणाचा हा खेळ भाजपा अजून किती दिवस सुरू ठेवणार?” असा सवाल देखील पटोलेंनी भाजपावर टीका करत उपस्थित केला आहे.
2014 ते 2019 या काळात किती उद्योग गुजरातला गेले हेही फडणवीसांनी सांगावे ! pic.twitter.com/X6HWdsqfXm
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 17, 2022
तर, “मन की बात नव्हे ‘मौन की बात’..- २०१४ साली ७५ प्रति किलो मिळणारी जीवनावश्यक तूरडाळही २०२२ मध्ये ११६ रुपये प्रति किलो झाली आहे. तब्बल ४० रुपयांची वाढ. मोदीजी मौन सोडा आणि यावरही बोला.” असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांकडून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा दिवस काँग्रेसकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून पाळला जात आहे. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत, त्यांनी खोटी जात सांगितली असल्याचे म्हणत टीका केली आहे. काँग्रेसच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.