
मुंबई : नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर चांदिवली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य विजयी ‘तिरंगा मार्च’ काढण्यात आला.
या तिरंगा मार्चचे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आरिफ नसीम खान तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले. बैलबाजार मनपा शाळा येथून या मार्चला प्रारंभ झाला. बेदी हॉल, काजूपाडा पाइपलाईन, ९० फूट रोड मार्गे निघालेला हा मार्च साकीनाका मेट्रो स्थानक येथे राष्ट्रगीताने संपन्न झाला. त्यानंतर उपस्थितांना मेलोडी चॉकलेट वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नसीम खान म्हणाले, देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळू शकत नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यातील केवळ पहिला टप्पा आहे; तो अंतिम विजय नाही. या संपूर्ण घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी होऊन प्रत्येक दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना खरा न्याय मिळणार नाही.
नसीम खान पुढे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत काँग्रेसचा हा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील. आंदोलनादरम्यान मुंबईसह राज्यभरातील विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसेच, देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या या गंभीर अन्यायाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी नसीम खान यांनी यावेळी केली.












































































































































