अलहाबाद : डॉ. काफिल खान यांची बुधवारी सुटका झाली. त्यानंतर त्यांनी मोठं विधान केलं. मला मुंबईवरून मथुरेपर्यंत आणताना माझा एन्काउंटर केला नाही, यासाठी मी उत्तर प्रदेश सरकारचे, एसटीफचेही आभार मानतो.
डॉ. काफिल खान यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत केलेला आरोप रद्द करत अलहाबाद उच्च न्यायालयानं बुधवारी त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर खान यांची मुक्तता करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खान यांनी उत्तर प्रदेश सरकारचे एन्काउंटर न केल्याबद्दल आभार मानले.
डॉ. काफिल खान यांच्यावर सुधारित नागरिकत्व कायदा बद्दल चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली होती. द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली एनएसए कायद्यातंर्गत कारवाई करत काफिल खान यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून काफिल खान मथुरेतील तुरुंगात बंद होते.
अतिशय योग्य न्याय देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा मी आभारी आहे
“अतिशय योग्य न्याय देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा मी आभारी आहे, रामायणात महर्षी वाल्मिकींनी म्हटलं आहे की, राजाने राज धर्मासाठी काम केले पाहिजे, पण उत्तर प्रदेशात राजा राजधर्म न करता फक्त बाल हट्ट करत आहे,” असं डॉ. कफिल यांनी सांगितले.