औरंगाबाद: शहरात गुन्हेगारी वाढली, महिला असुरक्षीत आहेत. नशेखोरीचा बाजार वाढला. कायदा सुव्यवस्था उरली नाही. गृहखाते करते काय असा सवाल करत खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
घाटीमध्ये दोन टोळक्याच्या वादात महिला डॉक्टरला दुखापत झाल्यामुळे खा.सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सायंकाळी घाटीत भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा, तथा घाटीच्या अभ्यागत समितीच्या सदस्या मेहराज पटेल, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. खा. सुप्रिया सुळे यांनी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुरेश हरबडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना खा. सुप्रिया सुळेंनी शहरातील, राज्यातील गुन्हेगारी, ड्रग्ज, कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल केला. सर्व गुन्हेगारी प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असे सांगितले.
डॉक्टरवर हल्ले ही लाजीरवाणी गोष्ट…
ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टरवर वार होतो, हे लाजिरवाणे आहे. गृहमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी त्यांची यंत्रणा काय करत आहे. स्थानिक डॉक्टरांनी सामंजस्य दाखवत आंदोलन मागे घेतले. घाटी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही केली. तसेच डॉक्टरांच्या स्टायफंड, सुरक्षा व इतर मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिकमध्ये होते. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत कांद्याविषयी काही चर्चा करतील अशी अपेक्षा होती. परंतु तिघांनीही चर्चा केली नाही. कांद्याच्या प्रश्नावर सुध्दा त्यांनी सरकारवर टीका केली. मुंबईत पंतप्रधान गेले तेथेही ब-याच समस्या आहे त्याबाबतही काही चर्चा झाली नाही. अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली.