मुंबई : सत्तांतर झाल्यापासून शिंदे सरकार अनेक निर्णय घेत आहे. दरम्यान यांनी राज्यातील रिक्षाचालक (Rickshaw Drivers) तसेच फेरीवाल्यांसाठी (Hawkers) नव्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. ते मालेगावमध्ये एका सभेला संबोधित करत होते.
“शिवसेना-भाजपा युतीचे सरकार राज्याला न्याय देईल. राज्याला पुढे घेऊन जाईल. गोरगरीब जनतेच्या मुलांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. त्यांची मुलं शिकली पाहिजेत. त्यांच्या परिवाराला वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे, यासाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, असे मला दादा भुसे यांनी सांगितले आहे. रिक्षावाला, ड्रायव्हर किंवा फेरीवाले असतील, या सर्वांसाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मला गरिबीची जाण आहे
“हा एकनाथ शिंदे तुमच्यातीलच एक आहे. मला गरिबीची जाण आहे. त्यामुळे महामंडळ स्थापन करण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम हे महामंडळ करेल. माजी मंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री उदय सामंत यांना त्याची जबाबदारी दिलेली आहे,” अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.