नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पक्षाची सर्वच पदे व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला. ते आपल्या 3 पानी राजीनाम्यात म्हणाले – ‘दुर्दैवाने पक्षात जेव्हा राहुल गांधी यांची एंट्री झाली व जानेवारी 2013 मध्ये जेव्हा तुम्ही त्यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली, तेव्हापासून त्यांनी पक्षाच्या सल्लागार व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकली.
आझाद एवढ्यावरच थांबले नाही, ते पुढे म्हणाले – राहुल यांच्या प्रवेशानंतर पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना साइडलाइन करण्यात आले. पक्षात बिगरअनुभवी विक्षिप्त लोकांचा एक नवा समुह तयार झाला. त्यानंतर हेच लोक पक्ष चालवू लागले.
काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच त्यांची जम्मू काश्मीरच्या पक्षाच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पण आझाद यांनी अवघ्या 2 तासांतच त्याचा राजीनामा दिला होता.
पक्षनेतृत्वाच्या निर्णयांमुळे होते नाराज
73 वर्षीय आझाद यांची आपल्या राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची इच्छा होती. पण केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याऐवजी 47 वर्षीय विकार रसूल वाणी यांच्याकडे या पदाची जबाबदारी सपवली. वाणी हे आझाद यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. आझाद यांना हा निर्णय आवडला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्व सातत्याने आझाद यांच्या विश्वासू नेत्यांना त्यांच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते. यामुळेही आझाद नाराज होते.
जी-23 ग्रुपचे सक्रिय सदस्य
गुलाम नबी आझाद पक्षाच्या बंडखोर जी-23 समुहाचे सक्रिय सदस्य होते. या गटाने पक्षात दिल्लीपासून गल्लीपर्यंत अमुलाग्र सुधारणांची मागणी केली होती. या गटाच्या कारवायांमुळे आझाद यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विशेषतः केंद्राने यंदाच त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केल्यामुळे त्यांची केंद्रातील सत्ताधारी भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा होती. या सर्वांची परिणिती आझाद यांच्या आजच्या राजीनाम्यात झाली आहे.
आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 15 फेब्रुवारी 2021 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर त्यांना एखाद्या दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर पाठवले जाईल, असा त्यांना वाटत होते. पण काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले नाही. आझाद यांच्या राज्यसभेतील निरोपावेळी पीएम मोदी चांगलेच भावूक झाले. 2021 मध्ये मोदी सरकारने त्यांचा पद्भूषण देऊन सन्मान केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हे आवडले नाही. आझादांनी हा सन्मान नाकारला असता तर बरे झाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.