नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनावर (covid-19) लस शोधण्यासाठी जगाचा प्रयत्न सुरु आहे. मात्र कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस (vaccine) येण्याआधी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने (global-covid-19) व्यक्त केली आहे.
जगभरात ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अद्यापही कोरोनावर लस शोधण्यात कोणत्याही देशाला यश मिळाले नाही. कोरोनामुळे २० लाख मृत्यू जगभरात होऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.
माईक रेयान UN एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख यांनीही ही भीती बोलून दाखवली आहे. करोना व्हायरसची बाधा होऊन मागील ९ महिन्यांमध्ये ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. लस येण्याआधी ही संख्या दुप्पट होईल. प्रभावी लस येण्याआधी २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी शक्यता अधिक आहे असंही रेयान यांनी म्हटलं आहे.
कोरोनाची बाधा होऊन आजवर अमेरिकेत २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात ९३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त, रशियात २० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहे तर भारतात ही एकूण रुग्णांची संख्या ५९ लाखांवर पोहचली आहे.
लॉकडाउनची बंधनं शिथील झाल्यानंतर लोकांनी घरांमध्ये ज्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली त्यामुळेही संक्रमण वाढलं असंही रेयान यांनी म्हटलं आहे. फक्त तरुण पिढीला यासाठी दोषी धरणं योग्य नाही असंही ते म्हणाले.
लॉकडॉउनची बंधने शिथील झाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मास्कचा, फिजिकल डिस्टंन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे प्रकार दिसून येत आहे.