मुंबई : मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. सांताक्रुझ येथे २७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai Rain Update) रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सखल भागात पाणी साचले आहे. आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (heavy-rainfall-likely-to-continue )आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढं पाणी साचलं आहे.
सांताक्रुझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे. चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कर्मचारी हे अडकून पडले आहेत. कार्यालयांना एका दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. मनपा क्षेत्राती सर्व कार्यालयांना सु्ट्टी देण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कार्यालय सुरु राहणार आहे.
आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी दिली. त्यांनी ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १२२.२ मिलीमीटर तर सांताक्रुझ येथे २७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा – महापालिका
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे वेळेत बदल तर काही रद्द
मुसळधार पावसामुळे काही लांब पल्ल्याच्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.