मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या (BJP) इशा-यावर नाचत आहेत. राजकारणात लाचारी कशाला म्हणतात हे एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या बीकेसी मैदानावरुन दाखवून दिली आहे. भाजपकडून एक स्क्रिप्ट तयार करुन शिंदेंना वाचायला लावली. ती स्क्रिप्ट ऐकण्यासाठी भाजपने कोट्यवधी रुपये खर्च केले. स्क्रिप्टमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विरोधापलीकडे काहीच नव्हते. शिंदेंचे स्वत:चे विचार नाही, दिलेली स्क्रिप्ट वाचण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केले. स्क्रिप्ट ऐकण्यासाठी भाजपने त्यांना कोट्यवधी रुपये देऊन लोकांना गोळा करण्याचा जो आदेश दिला होता त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केला. परंतु एकनाथराव स्क्रिप्ट वाचताना अभिनय जमलं पाहिजे. ते तुम्हाला जमणार नाही. शेवटी अभिनय करायला अक्कल लागते, तुम्ही अक्कलशून्य असल्यामुळे तुमची लायकी सर्व जनतेने लाईव्ह पाहिले.
पैसे देऊन कव्हरेज मिळतो, गर्दीही गोळा करता येते. जनतेची मने जिंकण्यासाठी जनतेमध्ये स्थान निर्माण करावा लागतो. जनतेच्या ह्द्यात स्थान निर्माण करावा लागतो. ‘५० खोके एकदम ओक्के’, तेवढा सोपा तो खेळ नाही. एकनाथ शिंदेंच्या खोका सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. एकनाथराव आतापर्यंत भाजपकडून मिळालेल्या स्क्रिप्टनुसार बोलत आहेत. कधी त्यांच्या माईक फडणवीस हिसकावून घेत आहेत तर कधी त्यांना बोलण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे एकनाथराव तुम्ही काय आहात हे सगळ्यांना माहित आहे. ज्या शिवसेनेच्या ताकदीवर तुम्ही रिक्षा ड्रायव्हर ते मंत्री झाला, गद्दारी करून मुख्यमंत्री झाला. तुमचा समाचार शिवसेनेने घेतलेलाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चांगलेच फटकारे लगावले. राजकीय आयुष्यात तुम्ही तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का मारुन घेतला तो कधीही पुसता येणार नाही. इमानदारी ही रक्तात पाहिजे. तुम्ही बेईमानी केली ती तुम्हाला काही काळ चांगलीही वाटत असेल परंतु तुम्ही आज मुख्यमंत्री असून सुध्दा त्रस्त आहात. शेवटी गद्दारी ही गद्दारीच असते. त्यामुळे कितीही पांढरे शुभ्र कपडे घातले तरी तुमचे मन साफ नाही. हे विसरता कामा नये.
आतापर्यंत रावण दहा तोंडांचा होता. आज तो पन्नास खोक्यांचा खोकासूर आहे; धोकासूर आहे. मी इस्पितळात असताना कट करणारा कटप्पा आहे. या शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंनी हल्लाबोल केला. तुमच्या बुडाला आज मंत्रिपदे चिकटली असतील पण कपाळावरील गद्दारीचा टीळा आयुष्यभर पुसता येणार नाही. संपलो असे त्यांना वाटत असेल, शिवसेनेच्या शक्तीशी तुम्ही पंगा घेतला आहे. देव तुमचे भले करो, ही धमकी नाही, आई भवानीच्या तेजाचा शाप आहे. एका जरी निष्ठावंत शिवसैनिकाने मला पक्षप्रमुख पदावरून दूर व्हा, म्हटले तर मी इथून चालता होईल. असे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी सांगितले. त्यात काहीच गैर नाही. शेवटी उध्दव ठाकरेंनी शिंदे गटाला त्यांची औकात दाखवून दिली. हेच काम सच्चे शिवसैनिक करत आहेत.
राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत त्यांनी त्यांच्या कामाच्या कौशल्यावर राज्याची प्रगती केली. परंतु एकनाथ शिंदे फक्त दिल्ली दरबारी मुजरा करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्रीपदावर काम करण्यासाठी ती लायकी नाही फक्त शिवसेना आणि काँग्रेस,राष्ट्रवादीला सत्तेतून खेचण्यासाठी भाजपने खोक्यांच्या जोरावर राज्याचे वाटोळे केले. त्यापलीकडे त्यांना काहीच करता आले नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन २०१४ पासून विरोधकांना त्रास देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. जवळपास १२५ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली. आज अनेक राज्यात भाजपने खोक्यांच्या बळावर सरकारे पाडली. परंतु त्यांना मतदार योग्य वेळी धडा शिकवेल. आज देशाचे वाटोळे झाले आहेत. महागाई, जातीय तेढ, बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र याकडे केंद्राचे लक्ष नाही. फक्त विरोधकांना संपवण्यात ते मश्गुल दिसत आहेत.
लेखिका: मेहराज पटेल