मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी २३ जानेवारीरोजी युतीची घोषणा केली. मात्र, वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. अशातच काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपाबरोबर आहेत, असं ते म्हणाले. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रकाश आंबेडकरांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही”, अशा इशाराही त्यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला.
महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी.
सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 25, 2023
नेमकं काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आंबेडकरांच्या विधानावर जयंत पाटलांचंही भाष्य
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही भाष्य केलं. “प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करत असल्याने विधान करण्याचा अधिकार राखून ठेवतो. पण, अजित पवार असं कुठं बोलले असतील वाटत नाही. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही खेळी असू शकते. मात्र, नंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली,” असं ते म्हणाले.