
मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri violence) येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारण्यात आलेला आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. तर, भाजपाकडून मात्र या बंदवरून महाविकासआघाडीवर जोरादार टीका केली जात आहे. हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. तर, फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patol) यांनी प्रत्युत्तर दिले असून, “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असं ते म्हणाले आहेत.
नाना पटोले यांनी आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या जनतेने बंदला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भाजपाने ज्या पद्धतीने या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं, या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणं, हा पद्धतीच्या हत्यारी व्यवस्थेला महाराष्ट्र भाजपा समर्थन करत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे. म्हणून आज ज्या पद्धतीने भाजपाने आजच्या बंदला विरोध केला, त्याचाही आम्ही निषेध करतोय.
तो यासाठी करतोय की उत्तर प्रदेशच्या भाजपा अध्यक्षांनी देखील झालेली घटना, जिथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांना मारण्यात आलं, त्याबद्दलची चिंता व्यक्त केली. परंतु, महाराष्ट्रामधील भाजपाचे नेतेमंडळी ज्या पद्धतीने या आंदोलनाचा विरोध करत होते. यातून भाजपाचं शेतकरी विरोधी धोरण स्पष्ट होत होतं. आजचा बंद हा चांगल्या पद्धतीने व शांततेत झालेला आहे. त्यामुळे जनतेचं समर्थन, महाविकासआघाडीच्या बरोबर आहे हे देखील सिद्ध झालं आणि भाजपाचा विरोध, आज पूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळालेला आहे.”
याचबरोबर, “भाजपाने हा बंद अयशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, रस्त्यावर ते उतरले नाहीत, त्यांना रस्त्यावरील घटना माहिती नाही. रस्त्यावर ज्यावेळी लोकं या बंदला प्रतिसाद देत होते, ते त्यांनी पाहिलं नसेल म्हणून अशा पद्धतीनचं वक्तव्य भाजपाकडून केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना ढोंगीपणाच वाटेल. कारण, की शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपाचा आता धंदा झालेला आहे.
शेतकरी विरोधी धोरण, केंद्र सरकारमधून तीन काळे कायदे करणे आणि मग शेतकरी हितासाठी जे कुणी लढेल त्यांच्यासाठी तो ढोंगीपणाच असतो. आपण पाहिलं असेल, राकेश टिकैतला त्यांनी दहशतवादी, नक्षलवादी घोषित केलं. शेतकऱ्यांच्या बाजूने जो बोलेल तो ढोंगी असतो, दहशतवादी असतो हे भाजपाचं धोरण आहे. त्यामुळे ते काही चुकीचं बोलले नाहीत, कारण भाजपा शेतकरी विरोधी आहे.” असंही पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.