मुंबई: दहा दिवस लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी तासनतास रांग लावल्याचं पाहायला मिळालं होतं. तर गणपती विसर्जनाच्या अखेरच्या दिवशी गणेशभक्तांना पुन्हा एकदा रांगेतच उभं राहावं लागलंय. फक्त ही रांग चक्क पोलीस स्थानकाच्या बाहेर लावण्यात आली होती. याचं कारण ठरलं विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ!
गणपती मिरवणुकीत चोरीला गेलेल्या सामानाची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेशभक्तांनी गर्दी केली. प्रत्येकाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती. मोबाईल चोरी आणि दागिन्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते.
दुपारच्या सुमारास चोरट्यांचा धुमाकूळ
गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. लालबागचा राजा मिरवणुकीत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण अखेरच्या दिवशी लालबाग परिसरात येत असतात. यंदा विसर्जन मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या गर्दीचा गैरफायदा घेत भामट्यांनी सामान्यांचे मोबाईल आणि दागिने लंपास केलेत.