मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ३११ पोलिसांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १९ हजार ३८५ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ६७० जण, कोरोनामुक्त झालेले १५ हजार ५२१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १९४ जणांचा समावेश आहे.
राज्यातील १९ हजार ३८५ पोलीस कोरोनाबाधित
राज्यातील १९ हजार ३८५ कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार १३१ अधिकारी व १७ हजार २५४ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार ६७० पोलिसांमध्ये ४७८ अधिकारी व ३ हजार १९२ कर्मचारी आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या १५ हजार ५२१ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६३५ व १३ हजार ८८६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १९४ पोलिसांमध्ये १८ अधिकारी व १७६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.