…आता ४६ हा आकडा भाजपाच्या २२ पेक्षा दुप्पट कोणताही ‘गणिती’ सांगेल;शिवसेनेचा फडणवीसांना टोला!

sanjay-raut-mocks-cm-eknath-shinde-bjp-savarkar-sanman-yatra-news-update-today
sanjay-raut-mocks-cm-eknath-shinde-bjp-savarkar-sanman-yatra-news-update-today

मुंबई:महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर (Zp And Panchayat Samiti Election Results) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं म्हटलं होतं. यावरुनच आता शिवसेनेने (Shiv-Sena) भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे. १०५ आमदार असलेला भाजपा आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे अशी आठवण करुन देताना शिवसेनेनं आकडेमोड समजवून सांगण्याचा प्रयत्न सामनाच्या अग्रलेखामधून केलाय.

फडणवीस काय म्हणाले होते?

“या निवडणुकीत भाजपानं निर्णय घेतला होता की आमचं स्थानिक नेतृत्व ती निवडणूक लढेल. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिलं आहे. २२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत.

२५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते तीन पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला आहे”, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने

“महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत.

ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने ७३ पेक्षा ३३ आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

अभिनंदन करायला संकोच वाटू नये

“जिल्हा परिषद निवडणुकांतही महाविकास आघाडीस ४६ तर भाजपाला २२ जागा मिळाल्या. आता ४६ हा आकडा भाजपाच्या २२ पेक्षा दुप्पट असे कोणताही ‘गणिती’ सांगेल. इतिहासाचे धडे बदलले जात आहेत तसे बीजगणित, भूमितीची प्रमेयेसुद्धा बदलली जात आहेत काय? या काही सरसकट निवडणुका नव्हत्या हे समजून घेतले पाहिजे. न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुकांना सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीला पालघर, नागपुरात, धुळे-नंदुरबारला चांगले यश मिळाले.

धुळ्यात भाजपाला विजय मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपापले गट राखले. काही नव्याने जिंकले. नंदुरबारला आदिवासी मतदारांनी भाजपाला धक्का दिला. नागपुरात काँग्रेसने आघाडी घेतली. असे चढउतार झाले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे म्हणणे असे की, त्यांचा पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. ते खरेच आहे. भाजपाने २२ जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला संकोच वाटू नये,” असंही या लेखात म्हटलं आहे.

विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही

“महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपाने आपली ताकद दाखवली आहे. भाजपाने २२ जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपाने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजपा हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे १०५ आमदार निवडून आले, पण १०५ आमदार असलेला भाजपा आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही,” असा टोला लेखामधून लगावण्यात आलाय.

हे काही माणुसकीचे लक्षण नाही

“देशातले वातावरण भाजपाविरोधी झाले आहे. उत्तर प्रदेशातील मंत्रीपुत्राने ज्या निर्घृणपणे शेतकऱ्यांना चिरडून मारले, त्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे. महाराष्ट्रातला शेतकरीही चिंतेत आहे. निसर्गाचा तडाखा आहेच, पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारनेही हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या सगळय़ांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करीत आहे. भाजपाची धोरणे सरळ सरळ शेतकरीविरोधी आहेत. भाजपा शेतकऱ्यांशी सूडाने वागत आहे. हा सूड शेतकऱ्यांचे मुडदे पाडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचला हे काही माणुसकीचे लक्षण नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मनाचा मोठेपणा लागतो…

“काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपाला मात दिली. अकोल्यात ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा वरचष्मा राहिला. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ताब्यातील नरखेड पंचायत समितीवर भाजपाने चढाई केली. प्रत्येक जय-विजयाची स्वतंत्र कारणे आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढूनही भाजपाला पुढे जाता आले नाही. याचा अर्थ असा की, जनतेने भाजपाला जमिनीवरच ठेवले आहे.

तरीही भाजपाला फार धावता आले नाही

भाजपाने महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. भ्रष्टाचाराचे, अफरातफरीचे बेफाम आरोप ते करीत राहिले. ईडी, सीबीआय, आयकरवाल्यांचा राजकीय वापर करून मंत्र्यांवर व आघाडीच्या नेत्यांवर दबाव टाकले. तरीही भाजपाला फार धावता आले नाही. महाविकास आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय?,” असा टोला फडणवीस यांना लगावण्यात आलाय.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here