मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj jarange) चा उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वात सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्याचे राजकारण बदलले आहे. या ठिकाणी सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे एक शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेऊन सरकारची बाजू मांडणार आहे. पण आंदोलक आरक्षणाचा GR काढण्याच्या मागणीवर ठाम असल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले. या आंदोलनात पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात अनेक जण जखमी झालेत. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. सरकारने शब्द दिल्यानंतर जरांगेंनी पाणी घेतले होते. पण आता सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला नाही तर पाणीही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता त्यांचे वजन कमी झाले आहे. तसेच बीपी, शुगरही कमी झाली आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच गंभीर, अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही- शरद पवार
ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर अन्याय, शरद पवार यांनी जळगावात मांडली भूमिका.
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. त्यानंतर आंतरवली सराटी येथे अनेक नेते आंदोलकांना भेटण्यासाठी जात आहेत. आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलनस्थळी जात उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली.
आज मुंबईत संयुक्त किसान मोर्चाचे राज्यस्तरीय अधिवेशन, शेतकरी प्रश्नांवर होणार चर्चा; जाहीरनामाही घोषित होणार.
मराठा क्रांती मोर्चाची सुरूवात करून अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या कोपर्डीत आता मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. येथील नागरिकांनी जालन्यात आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध केला. तसेच त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या या भूमिकेमुळे जालन्यातील आंदोलकांना मोठे बळ मिळाले आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष, सरकारने अंत पाहू नये, आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी असल्याचे ते म्हणाले.
अर्जुन खोतकर यांनी आज पुन्हा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी त्यांना सरकारचे एक शिष्टमंडळ लवकरच भेटीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना दिली.
आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आहोत, तुम्ही फक्त जीआर काढा, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी खोतकर यांच्याशी बोलताना मांडली.
मराठा समाजातील साधे गरीब लोक न्याय हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. ते 50 खोक्यांच्या सरकारपुढे झुकणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात याला. त्याचे अजूनही राज्यभर पडसाद उमटत आहेत. कोल्हापूर व यवतमाळमध्ये या घटनेच्या निषेधार्थ मराठा संघटांनी बंद पुकारला आहे.
मराठा समाजाने कोणत्याही स्थितीत आरक्षण घेण्याचा ठाम निर्धार केल्यामुळे कोल्हापूरमधील एसटी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.