
मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. (Maratha reservation petition to supreme court stay by Maharashtra government)
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं. तसंच मराठा बांधवांच्या मागण्यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत असंही म्हटलं होतं. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देत हे प्रकरण सुनावणीसाठी घटनापीठाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. स्थगितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या बुधवारी बैठक घेतली होती.
या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समाधानही व्यक्त केलं. दरम्यान आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.