मुंबई l मुंबईत सोमवारी शहर आणि उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. “सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे.
महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या कळवा-पडघा वीजवाहिनी क्रमांक१ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
वाचा l दिल्लीनं जे हिसकावून घेतलं, ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्तींचा इशारा
मुंबई परिसराचा वीज पुरवठा खंडित होण्याची ही गेल्या दशकभरातील चौथी मोठी घटना होती. चार ते पाच तास तीन जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावं लागलं. या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.