औरंगाबाद : राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू नसतो. आम्हाला नवीन भीडू मिळणार आहे. एमआयएम लोकसभेच्या पूर्ण जागा लढवणार असल्याचे सूचक विधान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisi) यांनी सोमवारी एअरपोर्टवर माध्यमांशी बोलताना केले.
शहराच्या नामांतराला विरोध असणाऱ्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हे नामांतरानंतर पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात आले होते. धुळे येथे सामुहिक विवाह सोहळयासाठी आज ओवेसी जात असताना त्यांनी शहरात माध्यमांशी चर्चा केली. त्यांनी यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणूक आणि “द केरला स्टोरी” या चित्रपटावरून भाजपवर टीका केली आहे.
ज्या पंतप्रधानांनी संविधानाची शपथ घेतली ते पंतप्रधान एका धर्माचा विषय बोलतात. हिंदुत्त्वाला धरून सध्या देशात स्पर्धा वाढली आहे. नितीश कुमार सुरूवातीला भाजपसोबत होते, त्यांनी आधी भाजपसाठी मत मागितली त्यानंतर आता ते भाजपच्या विरोधात बोलत आहेत. काँग्रसे पक्ष म्हणजे नाटक कंपनी आहे असं म्हणत ओवैसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
केवळ स्टोरीवर काय म्हणाले ओवैसी?
पंतप्रधान एका चित्रपटाचं प्रमोशन कसं करू शकतात? मुसलमानांचा मुद्दा उपस्थित करून जे आपलं पोट भरतात अशा लोकांना लाजा वाटल्या पाहिजे. काहीतरी खरं दाखवा. देशातील मुसलमानांनी आयएसआयचा कायमच विरोध केला आहे. त्यामुळे हे मुसलमानांनावर असे खोटे आरोप कसे काय करू शकतात?
या चित्रपटाचे सर्वांत मोठे प्रमोटर हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हिटलरने सुद्धा ७० लाख ज्यू लोकांना मारलं होतं. आधी त्याने भडकाऊ भाषणापासून सुरूवात केली होती. या इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे असं ओवैसी औरंगाबाद येथे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले. यावेळी खासदार इम्तियाज जलील, शहराध्य़क्ष शारेख नक्शबंदी, माजी गटनेते नासेर सिद्दीकी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.