मुंबई: मुंबई क्रूझ पार्टी आणि ड्रग प्रकरणावरुन (Cruise Drug Case) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी खळबळजनक दावा केला आहे. भाजपाच्या आदेशावरुन एनसीबी (NCB) कारवाई करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असाही आरोप केला आहे. एनसीबीने ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी तिघांना सोडून देण्यात आलेलं आहे. त्यातला एक व्यक्ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा दावा मलिकांनी केला होता. त्यांनी आता या भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव जाहीर केलं आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. असा दावा मलिक यांनी केला आहे.
आपल्या आरोपांसंदर्भातले पुरावे सादर करण्यासाठी नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले. ते म्हणाले, एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितलं की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मात्र खरं म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आलं आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचं नाव सुनावणीदरम्यान आलं आहे.
Rishabh Sachdeva and Pratik Gaba can be seen exiting from the NCB office after detention. pic.twitter.com/1KTS3QykPs
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 9, 2021
या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला.
या ड्रग्ज प्रकरणात ज्या तीन लोकांना सोडण्यात आलं, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा आरोप मलिक यांनी याआधीही केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचं नाव जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.
मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला होता.
नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप केला आहे. तसंच कारवाई करताना कायद्याचं पालन करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
नवाब मलिक यांनी आरोप करताना एनसीबी फक्त सेलिब्रेटी आणि त्यांच्याशी संबंधित काही ठराविक लोकांवर कारवाई करत असून राजकीय दबाव असल्याचं म्हटलं होतं. याला उत्तर देताना समीर वानखेडे यांनी ते सर्व सरकारी कर्मचारी असून त्याचं कर्तव्य बजावत होते असं सांगितलं होतं.