पुणे: राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मावस भावाचे अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा भीषण आणि विचित्र अपघात (Accident) झाला. या अपघातात भुमरे यांचे मावस भाऊ अंबादास हरिश्चंद्र नरवडे (Ambadas Narvade) यांचा मृत्यू झाला.
त्यांच्यासोबत असलेले चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच या अपघाताचा तपास सुरू केला आहे.
मंत्री संदिपान भुमरे यांचे मावस बंधू अंबादास हरिश्चंद्र नरवडे हे औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडचे रहिवाशी आहेत. ते आपल्या काही सहकाऱ्यांसह इनोव्हा गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते. पहाटे ४ वाजता कामशेतजवळ इनोव्हा गाडील टेम्पोला मागून येऊन धडकली. त्यामुळे इनोव्हा डिव्हाडरवर आदळली. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. अचानक झालेल्या या विचित्र अपघतामुळे नरवणे यांचा जागीच मृत्यू झाला.
अंबादास नरवडे यांच्यासोबत त्यांचे मित्रं आणि गाडी चालक होता. हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तळेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पैठण तालुक्यावर दु:खाचं सावट पसरलं आहे.
दरम्यान, मावस भावाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर संदिपान भुमरे यांनी नाईट ड्रेसवरच भल्या पहाटे घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आल्यानंतर भुमरे यांनी पोलीस आणि डॉक्टरांकडून घटनेची माहिती घेतली.
हा अपघात अत्यंत भीषण होता. टेम्पोने धडक दिल्यानंतर इनोव्हा गाडीचा स्पीड ब्रेकरवर आदळल्याचा आवाज आला. त्यानंतर ट्रकने धडक दिल्याचाही मोठा आवाज आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून स्थानिकांच्या साक्षी नोंदवल्या जात आहेत.