मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा मोठा की शिंदे गटाचा मेळावा मोठा (Dasara Melava Mumbai) याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि शिवसेनेमधील संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेने दसरा मेळाव्यात विचार नाही, तर नाटकं पहायला मिळतील अशी टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांचं वस्त्रहरण करतील अशी टीका केली आहे. दोन्ही गटाला समर्थन देणाऱ्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असंही ते म्हणाले.
“पहिल्यांदाच असं होणार आहे की, ज्यांचे जास्त लोक असतील तेच खरी शिवसेना असं ठरणार आहे. विचार ऐकायला कोणीच येणार नाही. आज विचारांना काहीच महत्त्व नाही, येथे वस्त्रहरणच होणार आहे. सोनं वैगेरे नाही, एकमेकांच्या अंगावरील चिंध्याच गोळा कराव्या लागतीत अशी परिस्थिती आहे, दोन्ही मेळावे यशस्वी होणं हे आयोजकांपेक्षा त्यांच्या मागे जी शक्ती त्यांची मोठी गरज आहे. त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे,” असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.