मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत गटप्रमुखांचा मेळावा आज ( २७ नोव्हेंबर ) पार पडत आहे. यामध्ये पालिका निवडणुका आणि अन्य राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
गटप्रमुखांच्या मेळाव्यापूर्वी मनसेकडून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यावर “महाराष्ट्रातील राजकारणाने हीन पातळी गाठली अशी सर्वदूर भावना आहे. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेणार आणि त्या बदलाची प्रेरणा असेल शिवछत्रपतींचं एक धोरणी वाक्य!,” असं लिहण्यात आलं आहे.
४ मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादला शेवटची सभा घेतली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राज ठाकरेंची ही पहिलीच मोठ्या स्वरूपातील सभा असणार आहे. मुंबईतल गोरेगावच्या नेस्को मैदानात हा गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. या सभेत राज ठाकरे कोणाचा समाचार घेतात? काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाने हीन पातळी गाठली अशी सर्वदूर भावना आहे… हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेणार… आणि त्या बदलाची प्रेरणा असेल शिवछत्रपतींचं एक धोरणी वाक्य ! pic.twitter.com/XVcGP7LsTE
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 24, 2022
दरम्यान, राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करत माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत चालेल.