
मुंबई: अमरावती शहरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक, जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट देखील चार दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफे कीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या संपूर्ण घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“रझा अकादमी काय म्हणत आहे, मला माहित नाही. रझा अकादमीमध्ये महाराष्ट्रात दंगली भडकवण्याच्या ताकद नाही, त्यांच्यावर सरकारनं नियंत्रण आणलंय. महत्वाचं म्हणजे त्रिपुरामध्ये असे काय घडले की त्याचे पडसाद राज्यात उमटले? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश मध्ये का नाही महाराष्ट्रातच का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्र अशांत करण्याचा हा प्रयत्न आहे,” असं राऊत म्हणाले.
“बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटना गंभीर आहेत. मग गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर मध्ये हिंदू पंडिताना मारले जाते त्या विरोधात कोणी आंदोलन का नाही करत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन झाले पाहिजे.
हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात सर्व राष्ट्रवादी संघटनांनी एकत्र यावं आणि नेतृत्व सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले पाहिजे. मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना हिंदूंवर होत असल्याच्या हल्ल्यांचा जाब विचारावा,” असं राऊत म्हणाले.
“रझा अकादमी जर दंगलीची जबाबदारी घेत नसेल तर मग हे सर्व कोणी केलं. त्रिपुरामध्ये काही घडलंच नाही तर व्हिडिओ आणि फोटो काय आहे. हा सर्व महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि तणाव निर्माण करायचा डाव आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.




































































































































