
मुंबई: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपावरून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ( ३० नोव्हेंबर ) मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
नवाब मलिक यांना ‘ईडी’ने जमीन खरेदीच्या व्यवहारात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपावरून अटक केली आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीबरोबर व्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. मात्र, न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यात आज मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काय आहे प्रकरण?
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांंच्यावर आरोप आहे. ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ ला अटक केली होती.