
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मुंबईत मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज्यपाल कोश्यारींसह,कृषीमंत्री अब्दुल सत्तार,काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचं आजचं भाषण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कानाखाली आवाज काढणारं होतं, असं विधान मिटकरी यांनी केलं आहे.
राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले, “राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून शिंदे गटाने लिहिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवली. मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज केलेलं भाषण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कानाखाली आवाज काढणारं ठरलं. भाजपा आजपर्यंत त्यांच्या (राज ठाकरे) खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा उद्देश साध्य करत होती. पण आता भाजपाचा भ्रमनिरास झाला असेल. निश्चितच देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते राज ठाकरेंच्या आजच्या भाषणामुळे अस्वस्थ झाले असतील, असं माझं मत आहे.”
“राज ठाकरेंनी राज्यपाल यांनाही खडेबोल सुनावले आहेत. तसेच शिंदे गटाचा एक वाचाळवीर मंत्री अब्दुल सत्तार यांचीही कानउघडणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आजच्या भाषणातून बऱ्यापैकी भाजपाच्या तोंडात हाणलं आहे” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे.
राज्यपाल पदावर बसला आहात, म्हणून मान राखतो
कोश्यारी म्हणतात, गुजराती-मारवाडी परतले तर मुंबईचं महत्त्व कमी होईल. कोश्यारी गुजराती-मारवाडी समाजाला विचारा उद्योगासाठी महाराष्ट्र का निवडला? कारण इथलं उद्योगस्नेही वातावरण त्यांना आकर्षित करतं. कोश्यारींकडून महाराष्ट्र समजून घेण्याची मराठी माणसाला गरज नाही
महाराष्ट्रातून इतके उद्योग गुजरातला चालला आहेत, ह्यावर धोतर (राज्यपाल कोशियारी) का नाही बोलले? गुजराती आणि मारवाडी महाराष्ट्रातून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल, असं कोशियारी म्हणाले, माझा प्रश्न आहे की मग गुजराती मारवाडी त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आले?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यांरीवर टीकास्र सोडताना राज ठाकरे म्हणाले, “आपलं वय काय? आणि आपण बोलतो काय? राज्यपाल पदावर बसला आहात, म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारावं, तुम्ही तुमचे राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुमच्या राज्यात का नाही व्यापर केला, उद्योग धंदे थाटले. याचं कारण, उद्योग आणि व्यापर करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन कोठे नव्हती,” अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.