मुंबई: महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत. आम्ही आता शांत बसणार नाही. केंद्राने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना परत बोलवायला पाहिजे. आम्ही एक दोन दिवस वाट बघू, अन्यथा महाराष्ट्र बंद करु किंवा मोठा मोर्चा काढू. त्यामध्ये सर्व शिवप्रेमी, महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज गुरुवार (ता.24) पत्रकार परिषदेत म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांच्यावरही बोम्मई यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत टीका केली. त्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय”
“गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहातोय, महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होतेय. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.