नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेशी संवाद साधत आज (२५ डिसेंबर) १५ ते १८ वयातील मुलांसाठी लसीकरणापासून बुस्टर (प्रिव्हेंशन) डोसपर्यंत ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “१५ ते १८ वयातील मुलांसाठी देशात लसीकरण सुरू होईल. २०२२ मध्ये ३ जानेवारीला सोमवारपासून याची सुरुवात होईल. हा निर्णय करोना विरोधातील देशाच्या लढाईला ताकद देईल. तसेच शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची काळजीही कमी करेल.”
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल असं पंतप्रधान म्हणाले. त्याची सुरुवात मात्र नव्या वर्षात 10 जानेवारीपासून करण्यात येईल असं मोदींनी जाहीर केलं.
मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
कोरोनाचा नवा व्हेरीएट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय.
देशातही रुग्णसंख्या वाढते आहे.
कुणीही घाबरु जायचं कारण नाही आहे.
सगळ्यांना सावध राहावं, सतर्क राहावं.
काळजी घ्यावी.
हात धुवत राहायला विसरायचं नाही आहे.
व्हायरस म्युटेट होत असल्यामुळे आपल्याला कोरोनाशी लढण्याची ताकदही वाढते आहे. त्यातही गुणाकार होतो आहे.
देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत.
५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत.
१ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत.
देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत.
४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत.
राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत.
चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय.
पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे.
लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशात 415 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 108, दिल्लीमध्ये 79, गुजरातमध्ये 43 , तेलंगाणा 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटक 31, राजस्थानमध्ये 22, हरयाणा 4, ओडिशा 4, आंध्र प्रदेश 4 , जम्मू काश्मीर 3, पश्चिम बंगाल 3, उत्तर प्रदेश 2, चंदीगढ 1, लडाख1, उत्तराखंडमध्ये 1 रुगणाची नोंद झाली आहे.