मुंबई : मराठा आरक्षणावरून सध्या वातावरण तापलेले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षावरून श्रीमंत मराठा आमदारांवर गंभीर आरोप केले. राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
आंबेडकर म्हणाले, “राज्यात २८८ पैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. त्यांचे एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध असून ते नात्यागोत्याचं राजकारण करतात आणि इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत.”
श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्यायला उतरायला हवं
दरम्यान, “गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावं म्हणून लढा उभा केला होता. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आता आता कोर्टात आहे. श्रीमंत मराठे सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने लढत नाहीत. त्यामुळे माझं गरीब मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्यायला उतरायला हवं. तर त्यांनी असं केलं तर त्यांना आरक्षण मिळेन अन्यथा त्यांनी आरक्षणावर पाणी सोडावं,” अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.