नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”मोदी सरकारची विचारसरणी – ‘किमान शासन, कमाल खासगीकरण’, कोविड तर एक निमित्त आहे, शासकीय कार्यालये ‘स्थायी कर्मचारी मुक्त’ बनवायचे आहेत. तरुणांचे भविष्य हिरावून घ्यायचे आहे, ‘मित्रांना’ पुढे न्यायचे आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटसोबत एक बातमी देखील शेअर केलेली आहे. ज्यामध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकराने खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने नव्या पदभरतींवर स्थगिती आणली असून, रिक्त पदांची भरती केली जात नसल्याचे म्हटले आहे. सोबतच #SpeakUp हा हॅशटॅग देखील जोडलेला आहे.
राहुल गांधी केंद्राच्या चुकीच्या धोरणांबाबत विरोधक म्हणून आपली भूमिका नेहमी मांडत असतात. सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत सल्ला ही देतात. यापूर्वी राहुल गांधी यांनी, “१२ कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलिअन अर्थव्यवस्था गायब, सामान्य नागरिकांचं उत्पन्न गायब, देशातील आनंदी वातावरण आणि सुरक्षा गायब, प्रश्न विचारला तर उत्तर गायब, विकास गायब आहे,” असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.