नवी दिल्ली : नीट आणि जेईई परीक्षेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तसंच प्रवासात येणाऱ्या अडचणींची दखल घेतली नाही. असं पुनर्विचार याचिकेत म्हटलं गेलं आहे. दरम्यान, स्थगितीसाठी सहा राज्यांकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
१७ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगरभाजप सहा राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या संकटामुळे JEE( जेईई )व NEET (नीट ) परीक्षा घेणे शक्य नाही
काँग्रेस अध्यक्षा सोनिय गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावल्यानंतर ही याचिका करण्यात आली आहे. बैठकीत कोरोनाच्या संकटामुळे अनेक राज्यांमध्ये जेईई व नीट परीक्षा घेणे शक्य नसून त्या पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे फेरयाचिका करण्याची सूचना ममता बॅनर्जी यांनी सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना केली होती.
JEE (जेईई) परीक्षा १-६ सप्टेंबर तर (NEET)नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी
जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यार्थी व पालकांचाच दबाव येत असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी स्पष्ट केले आहे. जेईई परीक्षा १-६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.