मुंबई : भाजपाकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सुशांतसिह प्रकरणाचा मुद्दा प्रचारासाठी समोर आणला जात आहे. भाजपाच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा,” असं ट्विट रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. यात भाजपाकडून छापण्यात आलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या स्टिकरचं छायाचित्र पोस्ट केलेलं आहे. “सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवलं केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरूवातील मुंबई पोलिसांकडे होता. त्यानंतर सीबीआयकडे देण्यात आला. बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर बिहार सरकारनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.