राज्यपालांचा ‘पॉलिटिकल एजंट’सारखा वापर चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नव्हे; संजय राऊतांचा भाजपला टोला

एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे घटनाविरोधी नाही

sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news
sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news

मुंबई l प्रतिस्पर्धी पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये राज्यपालांचा पॉलिटकल एजंटसारखा वापर करून तेथील परिस्थिती अस्थिर करणे, हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. (Sanjay Raut take a dig on Governor Bhagat Singh Koshyari )

 एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे घटनाविरोधी नाही, ही गोष्ट दिल्लीतील राज्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून संबंधित राज्यातील सरकार अस्थिर करायचे, हे धोरण चांगल्या राज्यकर्त्याला शोभत नाही, असे राऊत यांनी सांगितले. 

महाविकासआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा हवाला देत मंदिरे सुरु करण्याची विनंती केली होती.

तुम्ही आता ‘सेक्युलर’ झाला आहात का, असा खोचक प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. राज्यपालांच्या या पत्राला उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयत पण परखड भाषेत प्रत्युत्तर दिले होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. या लेखात त्यांनी भाजप विविव राज्यांतील विरोधी सरकारे अस्थिर करण्यासाठी कोणते डावपेच खेळत आहे, याचा पाढा वाचला आहे.

महाराष्ट्रातही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत भाजप ‘निपट डालो’ हे धोरण वापरत असल्याचे त्यांनी म्हटले.

गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत. पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले. एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. हे एक आणीबाणीसदृश्य धोरण राबवले जात आहे.

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवार संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना ‘निपट डालो’ हा अजेंडा भाजप राबवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.