जातीयवादी देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते : नाना पटोले

Seva-Dal-congress-satate-president-nana-patole
Seva-Dal-congress-satate-president-nana-patole

मुंबई l देश पारतंत्र्यात असताना जशी परिस्थिती होती तशीच परिस्थीती सध्या देशात आहे त्यामुळे सेवादलाची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे परंतु काही शक्ती देशाला तोडण्याचे काम करत आहेत. या जातीयवादी, देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सुभाषचंद्र बोस, राजीव गांधी हे सुद्धा सेवादलाचे अध्यक्ष होते. सेवादल हा काँग्रेसचा कणा आहे. देशातील सध्याची परिस्थीती पाहता सेवादलावर मोठी जबाबदारी असून देश तोडण्याऱ्या शक्तींना रोखा व केंद्रातील सरकारचे अपयश तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,  सेवादल महाराष्ट्रचे प्रभारी लालजी मिश्रा, अखिल भारतीय सेवादल समन्वयक व मध्य प्रदेशचे प्रभारी कृष्णकांत पांडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाची सेवा करण्याचे व्रत घेऊन नारायण हर्डीकर यांनी नागपुरात सेवादलाची स्थापना केली. काँग्रेसचा विचार हा देशहिताचा विचार असून तो शेवटच्या माणसापर्यंत पोहवण्याचे काम सेवादलाने केले आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे. इंग्रजांच्या विरोधात सेवादलाने संघर्ष केला. आता देशातील सत्तेविरोधातच संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

पंडित जवाहरलाल नेहरुंनी या देशाच्या विकासाची पायाभरणी केली. मोठ-मोठे प्रकल्प उभे केले,  संस्था निर्माण केल्या. नेहरुंनी उभे केलेले सर्व वैभव एक एक करुन विकण्याचे काम सध्या केले जात आहे. इतिहास पुसण्याचे कामही केले जात आहे. या शक्तींना थोपवण्यासाठी सेवादलाने नव्या ताकदीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रात सेवादलाचे काम अशा पद्धतीने करा की त्याची दखल देशपातळीवर घेतली पाहिजे.

महाराष्ट्रात सेवादलाने कोरोना काळात लोकांना मदत केली, अन्नधान्य, किराणा किट, औषधे पोहचवली, अतिवृष्टी व पुराच्यावेळीही लोकांच्या मदतीला सेवादल धावले. रक्तदान शिबीरे घेतली, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिम राबवण्यासह अनेक कार्यात सेवादल अग्रभागी राहिले आहे अशी माहिती सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here