मुंबई: सचिन वाझे Sachin Vaze प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल सुरु आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग Parmbir singh police commissioner यांना विरोधी पक्षाने टार्गेट केलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी या संपूर्ण प्रकणावर आपली भूमिका मांडली आहे.
सोमवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी गेल्यामुळे या मुद्द्यावरचं गूढ अधिकच वाढलं. आज दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व सहकारी व्यवस्थित काम करत आहेत. काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील.” दरम्यान, सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्ष टार्गेट करत असताना तो मुद्दा शरद पवारांनी फेटाळून लावला.
हेही वाचा: सचिन वाझेंच्या आडून मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा भाजपचा प्रयत्न; नाना पटोलेंचा आरोप
“एका सब इन्स्पेक्टरचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल असं मला वाटत नाही. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं आणि ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत”, असं ते म्हणाले.
गृहमंत्र्यांनी या प्रकरणात योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडली
दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. “परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार की नाही, हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा”, असं ते म्हणाले. तसेच, “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणात जबाबदारी पार पाडली आहे आणि जे दोषी आहेत त्यांना सगळ्यांसमोर आणलं”, असं म्हणत त्यांनी अनिल देशमुखांचं कौतुक केलं.