मुंबई l केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray कानाखाली लावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात शिवसेनेकडून नाराणय राणेंचा निषेध करण्याची तयारी सुरु असून पुणे, नाशिक आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनीदेखील नारायण राणेंवर टीका केली असून त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे असं म्हटलं आहे.
“मला वाटतं नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री…ज्यांनी ही पदं भोगली आहेत, या पदाची गरिमा त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“नाराय़ण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असतानाही राज्यात विरोधी पक्षनेते होते. पण त्यांची एक गरिमा होती. पण सध्या गरिमा नसलेलं भूत आलं आहे. यांच्या अंगात भूत घुसलं आहे का असं वाटतं. त्यांना भानूमतीच्या एखाद्या भक्ताकडे नेऊन अंगात काय घुसलं आहे पाहिलं पाहिजे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी ते माफी मागण्याच्याही लायकीचे नाहीत असं म्हटलं आहे.
नारायण राणेंचं नेमकं वक्तव्य काय …
नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.
“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल.
त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा
Narayan Rane l नारायण राणेंना अटक होणार? अटकेसाठी नाशिक पोलीस रवाना