चिखली,जि.बुलढाणा: “आपणही २५-३० वर्षे भाजपाबरोबर होतो. मात्र, आजचा भाजपा पक्ष (BJP) आयात पक्ष झालाय. विचार संपले, नेते संपले, भाकड पक्ष झाला आहे. तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फक्त यादी काढा आणि त्यात बाहेरून यांच्या पक्षात आयात केलेले किती लोक आहेत हे पाहा. त्यामुळे हा आयात पक्ष झाला आहे.” असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.
“या आयात पक्षाची सुरू असलेली दादागिरी, हुकुमशाही आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही का? अरे हा पक्ष आहे की चोरबाजार? त्यांच्याकडे स्वतःकडे काहीच शिल्लक राहिलं नाही. ते बाहेरून चोरून इतरांचे नेते घेत आहेत आणि आपल्याविरोधात त्यांना उभे करत आहेत. ते शनिवारी (२६ नोव्हेंबर) बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा खरपूस समाचार घेतला. “आपल्या पलिकडच्या ताईंना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक करण्यात आली आणि मग मोठ्या हुशार ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांच्यावर केला. तसेच मोदींना राखी बांधल्यानंतर गवळींवरील ईडी-सीबीआय कारवाई थांबली, असंही नमूद केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या पलिकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. त्या आपल्या ताई होत्या आणि आहेत. आपणच त्यांना दोनदा, चारदा, पाचदा कितीवेळा खासदार केलं हे तुम्हाला माहिती आहे. इथल्या गद्दार आमदारांनाही शिवसैनिकांनीच राबराब राबून निवडून आणलं आणि खासदार केलं होतं. मात्र, या ताईंना धमक्या देण्यात आल्या.”
“खास मुंबईहून इकडे ताईंकडे दलाल पाठवले जायचे”
“खास मुंबईहून इकडे ताईंकडे दलाल पाठवले जायचे. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली, पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
“मोदींना राखी बांधणाऱ्या ताईंवर कारवाईची”..
“तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? त्या तिकडे गेल्यावर त्यांना सर्व आरोपांपासून संरक्षण मिळालं. हे सर्व आणि ही तुमची चालुगिरी लोक बघत आहेत,” असं म्हणत ठाकरेंनी भावना गवळींवर टीका केली.